चिखलीत महायुतीच्या भव्य दहीहंडीचा थरार; हजारो चिखलीकरांच्या उपस्थितीत उत्साहाला उधाण..

 केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीने वाढली रंगत; सेलिब्रिटींच्या अदाकारीने तरुणाईला भुरळ..



महेश गोंधणे:-श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणाऱ्या दहीहंडी उत्सवाचा थरार, गोविंदांच्या मानवी मनोऱ्यांची चित्तथरारक उंची, ढोल-ताशांचा कडकडाट, डीजेच्या तालावर हजारो चिखलीकरांचा उत्स्फूर्त जल्लोष आणि मंचावरून सेलिब्रिटींच्या दमदार अदाकारीने निर्माण झालेल्या उत्साहात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित महायुतीची भव्य दहीहंडी छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या दिमाखात पार पडली. चिखली शहरासह तालुक्यातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी दाखल झाल्याने संपूर्ण परिसराला जणू यात्रेचे आणि उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.


दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी एकावर एक असे मानवी मनोरे रचण्यास सुरुवात करताच उपस्थितांच्या नजरा आकाशाकडे खिळल्या. प्रत्येक थर वाढत गेला तसतसा ‘गोविंदा आला रे आला... गोपाळा आला’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. गोविंदांच्या प्रत्येक प्रयत्नाला हजारो नागरिकांकडून टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषातून प्रोत्साहन मिळत होते. हंडी फोडण्याचा निर्णायक क्षण जवळ येताच उत्साहाने अक्षरशः परिसीमा गाठली आणि हंडी फुटताच गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण, जल्लोष आणि टाळ्यांच्या कडकडाटात चिखलीकरांनी आनंदोत्सव साजरा केला.


मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री  प्रतापराव जाधव यांनी या महायुतीच्या भव्य दहीहंडीला आवर्जून भेट देत गोविंदा पथकांचा तसेच उपस्थित चिखलीकरांचा उत्साह वाढविला. यावेळी आपल्या छोटेखानी भाषणातून त्यांनी दहीहंडी उत्सवाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर भाष्य केले.

“दहीहंडीचा हा उत्सव केवळ देशातच नव्हे, तर जगातील अनेक ठिकाणी साजरा केला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र येतो. त्यामुळे प्रत्येकाला वैयक्तिक समाधान मिळते आणि त्याचबरोबर सामाजिक एकताही अधिक दृढ होते,” असे प्रतिपादन ना. प्रतापराव जाधव यांनी केले.

चिखलीतील महायुतीच्या दहीहंडीचे कौतुक करताना ते म्हणाले की, आपण या दहीहंडीला नेहमी येत असतो; मात्र प्रत्येक वेळी मागील वर्षापेक्षा काहीतरी अधिक मोठे आणि काहीतरी वेगळे या दहीहंडीत पाहायला मिळते. चिखलीकरांचा वाढता सहभाग आणि दरवर्षी वाढत जाणारी भव्यता ही या उत्सवाची विशेष ओळख असल्याचे त्यांच्या भाषणातून अधोरेखित झाले.


या भव्य दहीहंडीचे आणखी एक प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर, अभिनेत्री ईशिता दत्ता, श्रद्धा शौर्या अँकर भाविका  यांची उपस्थिती. सेलिब्रिटींचे मंचावर आगमन होताच तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह संचारला. कलाकारांनी प्रेक्षकांशी मनमोकळा संवाद साधत, आपल्या अदाकारीने आणि उत्साहवर्धक आवाहनांनी वातावरणात रंग भरला.

“चिखलीकरांचा हा उत्साह पाहून आमचाही उत्साह द्विगुणित झाला आहे!”, “गोविंदांच्या जोशाला चिखलीकरांच्या टाळ्यांची जोरदार दाद मिळाली पाहिजे!”, अशा उत्साहवर्धक आवाहनांना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषाने प्रतिसाद दिला. अँकर भाविकाच्या दमदार सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला सतत वेग मिळत राहिला. तिच्या आवाहनांवर हजारो हात एकाच वेळी टाळ्यांसाठी वर जात होते, तर डीजेच्या तालावर तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

या संपूर्ण सोहळ्याचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांचा जोशपूर्ण आणि उत्साहाने भरलेला सहभाग. दहीहंडीचा आनंद घेताना त्या केवळ मंचावर उपस्थित राहिल्या नाहीत, तर गोविंदा पथकांना प्रोत्साहन देणे, नागरिकांच्या उत्साहाला प्रतिसाद देणे आणि सेलिब्रिटींसोबत कार्यक्रमाची रंगत वाढविण्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

गोविंदांच्या प्रत्येक थरासोबत वाढणारा ताईंचा उत्साह आणि उपस्थितांना प्रोत्साहन देण्याची त्यांची शैली पाहून चिखलीकरांमध्येही उत्साहाची लाट निर्माण झाली. “चिखलीचा जल्लोष आणखी मोठा झाला पाहिजे,” अशा आवाहनांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी आमदार श्वेता महाले यांनी दहीहंडीच्या प्रतीकातून जीवनाचा आणि विकासाचा संदेशही दिला. “दहीहंडी फोडण्यासाठी जसे एकावर एक थर रचावे लागतात, तसेच जीवनातील प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी अडचणीची एक-एक पायरी ओलांडावी लागते. अडचणीच्या त्या प्रत्येक पायरीवर तुमची हक्काची बहीण आमदार श्वेता महाले तुमच्या सोबत प्रत्येक पावलावर उभी असेल,” असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.

त्यांच्या या भावनिक संवादाला उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

चिखलीच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या आमदार श्वेता महाले यांच्या पाठपुराव्यातून मतदारसंघात रस्ते, पाणीपुरवठा, मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेअंतर्गत शेतरस्ते, चिखली शहरातील एस.व्ही.एम. अभ्यासिका, धाड येथील अभ्यासिकेसाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी, चिखली ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बोर्ड व सोनोग्राफी मशीनसारख्या आरोग्य सुविधा, खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा तसेच चिखलीत सुमारे ६५ कोटी रुपयांची भव्य शिवसृष्टी उभारण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अशा विविध विकासकामांना आणि उपक्रमांना गती मिळाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाशी समन्वय साधत चिखलीच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका आमदार श्वेता महाले पाटील बजावत आहेत. दहीहंडीच्या या उत्सवामध्ये आमदार श्वेता महाले यांनी केलेल्या विकासात्मक कामाचा आढावा घेण्यात आला.

दहीहंडी म्हणजे केवळ हंडी फोडण्याचा उत्सव नाही, तर एकजूट, संघभावना, परस्पर सहकार्य आणि सामूहिक शक्तीचे प्रतीक आहे. एकावर एक थर रचताना प्रत्येक गोविंदाची भूमिका महत्त्वाची असते; त्याचप्रमाणे चिखलीच्या विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येणे गरजेचे आहे, असा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

“चिखली थांबणार नाही! चिखली झुकणार नाही! चिखली विकासाच्या मार्गावरून मागे जाणार नाही!” असा निर्धार या भव्य दहीहंडीच्या माध्यमातून व्यक्त झाला. हजारो चिखलीकरांचा उत्स्फूर्त सहभाग, गोविंदांचा थरार, डीजेच्या तालावरचा जल्लोष, सेलिब्रिटींची रंगतदार उपस्थिती, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा सामाजिक एकतेचा संदेश आणि आमदार श्वेता महाले  यांचा जोशपूर्ण सहभाग यामुळे चिखलीची महादहीहंडी यंदाही अविस्मरणीय ठरली.

उत्सवाचा आनंद, सामाजिक एकतेचा संदेश आणि विकासाचा संकल्प यांचा सुंदर मिलाफ साधणारा हा सोहळा चिखलीकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे खऱ्या अर्थाने लोकउत्सव ठरला... या याप्रसंगी मंचकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव श्री विद्याधरजी महाले,बुलढाणा माजी आमदार व भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, मेहकर चे माजी आमदार संजय रायमुलकर, सिंदखेडराजाचे माजी आमदार तोताराम कायंदे, जिल्हा सहकारी बँकेचे नवनियुक्त संचालक अंकुशरावजी पाटील, चिखली नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख, उपनगराध्यक्ष वैशालीताई खेडेकर, तसेच आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Previous Post Next Post