करुणा आणि समतेच्या विचारांना नवी दिशा देण्याचे काम भगवान गौतम बुद्ध यांनी केले.. आ.श्वेता महाले.

 आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत भादोला येथे नवीन बुद्धविहाराच्या भूमिपूजनाचा शुभारंभ..



बुलढाणा)-तथागत भगवान गौतम बुद्धांनी जगाला दिलेला प्रज्ञा, शील, करुणा,समता आणि मानवतेचा संदेश हा केवळ एका धर्मापुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीला शांतता आणि माणुसकीची वाट दाखविणारा आहे. याच महान विचारांचा प्रसार करणाऱ्या नवीन बुद्धविहाराच्या निर्माणकार्याचा शुभारंभ होत असताना या पवित्र क्षणाची साक्षीदार होण्याचा भावनिक योग चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांना लाभला.

बुलढाणा मतदारसंघातील मौजे भादोला येथे बुद्ध रश्मी महाविहार, बुलढाणा यांच्या वतीने नवीन बुद्धविहारासाठी खरेदी करण्यात आलेल्या भूमीवर आज पावन भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या मंगल प्रसंगी आ. श्वेता महाले यांनी उपस्थित राहून बुद्धविहाराच्या निर्माणकार्याला शुभेच्छा दिल्या.

भगवान बुद्धांनी “वैराने वैर कधीही संपत नाही; प्रेमानेच वैर संपते” असा मानवतेला संदेश दिला. आज समाजात वाढत चाललेल्या तणावाच्या आणि मतभेदांच्या वातावरणात बुद्धांचे हे विचार अधिकच प्रासंगिक ठरत आहेत. माणसामाणसांमध्ये भेद न करता समता, बंधुता आणि करुणेची भावना रुजविणारे केंद्र म्हणून हा बुद्धविहार भविष्यात समाजासाठी प्रेरणास्थान ठरेल, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

आमदार श्वेता महाले यांनी या पवित्र भूमीवर माथा टेकवत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांना अभिवादन केले. विकासाची वाट चालताना समाजाच्या मनात माणुसकी, समता आणि संवेदनशीलता जिवंत राहणे तितकेच महत्त्वाचे आहे, या भावनेतून त्यांनी बुद्धविहाराच्या भावी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या वेळी पूजनीय भन्ते यांचे आशीर्वाद घेतले.भूमिपूजन सोहळ्यास भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय गाडेकर, जिल्हा सरचिटणीस  दत्ता पाटील, शहराध्यक्ष  मंदार बाहेकर, सरपंच संजय ठेंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते...

Previous Post Next Post