शहीद जवानाच्या वीरपत्नीला भाजपकडून ध्वजारोहणाचा मान; राजा टॉवरवर देशभक्तीचा भावस्पर्शी क्षण... भारताच्या

 स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय जनता पक्ष चिखलीच्या वतीने राजाटॉवर येथे झेंडावंदन...

(महेश गोंधणे)
 चिखली:-राजा टॉवर येथे शहीद जवान स्व. हरिदास कापसे यांच्या वीरपत्नी श्रीमती वृषाली हरिदास कापसे यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानाच्या वीरपत्नीच्या हस्ते तिरंगा फडकवून त्यांच्या त्यागाला आणि शौर्याला मानवंदना देण्याचा हा भावस्पर्शी उपक्रम ठरला.चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार  श्वेताताई महाले  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तिरंगा फडकताच उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत शहीद जवान स्व. हरिदास कापसे यांच्या बलिदानाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले.“ज्यांनी भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविणे ही केवळ औपचारिकता नसून त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे,” या भावनेतून भाजप चिखलीने वृषाली कापसे यांना हा मान दिला.वीरपत्नी वृषाली कापसे यांच्या हस्ते तिरंगा फडकत असताना उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना अधिक तीव्र झाली.शहीद पतीच्या बलिदानाची आठवण हृदयात घेऊन वीरपत्नीने राष्ट्रध्वजाला दिलेली मानवंदना हा क्षण उपस्थितांसाठी भावुक करणारा ठरला. शहीदांच्या त्यागामुळेच देशाचा तिरंगा आज स्वाभिमानाने फडकत आहे, याची जाणीव या प्रसंगी सर्वांना झाली.ध्वजारोहणानंतर राजा टॉवर येथून छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानापर्यंत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा घेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतमाता आणि राष्ट्रध्वजाच्या जयघोषाने चिखलीचा परिसर दुमदुमून टाकला.

या कार्यक्रमातून शहीदांच्या बलिदानाचा सन्मान, वीर कुटुंबीयांप्रती कृतज्ञता आणि राष्ट्रध्वजाप्रती अभिमान या तीनही भावना एकाच वेळी अधोरेखित झाल्या. भारतीय जनता पक्ष चिखलीने वीरपत्नी वृषालीताई कापसे यांना दिलेला ध्वजारोहणाचा मान हा स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातील विशेष आणि स्मरणीय क्षण ठरला...

Previous Post Next Post