शेलूदचा वर्षानुवर्षांचा वगदी मार्गाचा प्रश्न अखेर मार्गी..
महेश गोंधणे-
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांच्या अथक पाठपुराव्यामुळे मौजे शेलुद येथील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला वगदी मार्गाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत तब्बल १ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.
मौजे शेलुद येथे चिखली नगरीचे आराध्यदैवत आई श्री रेणुकादेवीच्या यात्रेनिमित्त निघणाऱ्या मानाच्या पातळ व वगदी मार्गासाठी गावकऱ्यांनी अनेक वर्षे विविध लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र तत्कालीन लोकप्रतिनिधींनी या न्याय्य मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केले. आमदार श्वेता महाले यांनी मतदारसंघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून तो अखेर मार्गी लावला.
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत खालील कामांचा समावेश आहे.शेलूद ते चिखली नगरपालिका हद्द — २ किलोमीटर रस्ता, किंमत ४० लक्ष रुपये,शेलूद-चिखली जुना पाणंद रस्ता ते पाळाची देवी — २ किलोमीटर रस्ता, किंमत ४० लक्ष रुपये,श्री नागानंद स्वामी संस्थान, पर्यटन विकास — २० लक्ष रुपये
अशा एकूण १ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात "सबका साथ, सबका विकास" या तत्त्वावर ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण रस्ते, शेतकऱ्यांसाठी पाणंद मार्ग आणि दळणवळण सुविधांचे जाळे देशभर विस्तारत आहे. याच प्रेरणेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजना प्रभावीपणे राबवली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सुलभ पोहोच मिळावी, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट व्हावी आणि गावागावांचा सर्वांगीण विकास व्हावा, हा या योजनेमागचा दूरदर्शी विचार आहे. आमदार श्वेता महाले या याच विकासदृष्टीने प्रेरित होऊन चिखली मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात विकासकामे पोहोचवण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत.
यावेळी आमदार श्वेता महाले म्हणाल्या, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण विकासाला नवी गती मिळत आहे. शेलूदच्या जनतेने अनेक वर्षे ज्या मार्गासाठी प्रतीक्षा केली, तो प्रश्न सोडवताना मला विशेष समाधान आहे. ही विकासकामे गावातील नागरिकांच्या जीवनमानात निश्चितच सकारात्मक बदल घडवतील.ही विकासकामे शेतकरी, नागरिक आणि गावाच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार असून चिखली मतदारसंघाच्या ग्रामीण विकासाला यामुळे नवी दिशा मिळणार आहे."
या भूमिपूजन सोहळ्यास सुरेशआप्पा खबुतरे (ज्येष्ठ नेते, भाजप), सरपंच मंगेश इंगळे, गोपाल अप्पा शेटे, पत्रकार गोपाल तुपकर, संतोष नाना इंगळे,सरपंच सुनील चिंचोले,नगरसेवक दीपक वाधवाणी यांच्यासह गावातील शेकडो नागरिक उत्साहाने उपस्थित होते.

