ट्यूशन/क्लासेसला जातोय असे सांगूनअल्प वयातील विद्यार्थी/विद्यार्थिनी करताहेत मौज-मस्ती पालकांनी दखल घेण्याची आवश्यकता

चिखली : शिकवणीला जातोय असं सांगून काही विद्यार्थी व विद्यार्थिनी घराबाहेर पडत असून,  वास्तविकपणे  अल्प वयिन  विद्यार्थी व विद्यार्थीनी   अभ्यासाऐवजी कॅफे सेंटर, लॉज अशा ठिकाणी जाऊन वेळ घालवत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या वर्तनामुळे ना केवळ त्यांच्या शिक्षणावर व भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, तर सामाजिक व मानसिक पातळीवरही गंभीर दुष्परिणाम निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
आज सकाळी चिखली येथील शिंदे हॉस्पिटलजवळ असलेल्या एका कॅफेमध्ये दोन अल्पवयीन मुली व दोन मुलं आढळून आले. चौकशीतून उघड झालं की या मुलींनी घरी क्लासला जात असल्याचं सांगितलं होतं. दोन्ही मुली 14 ते 15 वयोगटातील असून, ही बाब अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारी आहे. चिखली पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्वांना समज दिली, जबाब नोंदवले आणि भविष्यात अशी कृती होणार नाही याची हमी घेऊन सोडून दिलं.वास्तविकपने चिखली शहर पोलिस यांनी सदर बाबतीत गंभीरता बाळगणे काळाची गरज वाटते.
या घटनेनंतर चिखलीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची नितांत गरज आहे. “मुलं कुठे जात आहेत? खरोखर क्लासलाच जात आहेत का?” याची खात्री करून घेणं ही जबाबदारी आता पालकांची बनते आहे. तसंच शिकवणी वर्ग चालक व शिक्षकांनीही आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती व वागणूक यावर सतत लक्ष ठेवावं.
दुसरीकडे, या बाबतीत चिखलीतील काही कॅफे चालक “नाश्ता कॉर्नर” किंवा “कॅफे”च्या नावाखाली अल्पवयीन मुला-मुलींना थांबण्यास परवानगी देत असल्याचे समोर येत आहे. ही बाब कायदेशीररित्या गंभीर असून अशा प्रकारांना थारा देणाऱ्या कॅफे चालकांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे. पोलीस प्रशासनाने या कॅफे चालकाला तंबी दिली असून, अशा प्रकारांना परवानगी दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
या घटनांमुळे निर्माण होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये शिक्षणात खंड, गैरमार्गाकडे ओढ, सामाजिक अपयश व नैतिक अधःपतन या गोष्टींचा समावेश आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांनी क्षणिक आकर्षणांमुळे आपल्या आयुष्याचं नुकसान होऊ देऊ नये, हे लक्षात घेणं अत्यावश्यक आहे.
पालक, शिक्षक, कॅफे चालक आणि समाज यांचं संयुक्त उत्तरदायित्वच अशा घटनांना रोखू शकते.
Previous Post Next Post